एक काळ असा येऊ शकतो जेव्हा जगात फक्त मुलीच जन्माला येतील अशी शक्यता एका संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. जन्माला येणारा मुलगा असेल की मुलगी हे आईवडीलांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. स्त्रियांमध्ये  XX गुणसुत्रे असतात. तर पुरुषांमध्ये XY गुणसुत्रे असतात. म्हणजे XX गुणसुत्रे एकत्र आल्यास मुलीचा जन्म होतो तर XY गुणसुत्रे एकत्र आल्यास मुलाचा जन्म होतो. मात्र सायन्स अलर्टच्या संशोधनात समोर आलं आहे की, मानवातला Y गुणसुत्र (मेल क्रोमोझोम) कमी होत चाललाय.  इतकंच नाही भविष्यात तो संपूर्णपणे नाहीसा देखील होऊ शकतो. जर असं झालं तर काय होईल अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. अर्थातच तो नष्ट होण्यास लाखो वर्ष लागतील. मात्र असे झालेच म्हणजे जर Y गुणसुत्र नष्ट झाले तर पृथ्वीवरील जीवनच नष्ट होईल. मात्र, Proceedings of the National Academy of Sciences मध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये एक चांगली बातमी आहे. उंदरांच्या दोन प्रजातींमधून Y गुणसुत्र कायमचंच नष्ट झालं आहे. मात्र तरीही त्यांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात यश आलं आहे.