मुंबई : मराठवाडा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवाविषयी सरकारची अनास्था आहे. तरी सरकारने या विषयीची आपली भूमीका तातडीने स्पष्ट करुन उर्वरीत पाच महिन्यात तरी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

मराठवाडा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षे साजरे करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, तरी सरकारने या विषयी आपली भूमीका तातडीने स्पष्ट करावी. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘मराठवाडा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम याविषयी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुध्दा हा विषय मी मांडला होता. मात्र अजूनही सरकारकडून या विषयी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा करण्या विषयी साधा प्रस्ताव सुध्दा सरकारच्यावतीने सभागृहात आणला नाही. सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे ? त्यांच नियोजन काय ? हे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले नाही.’