आपण भूक लागली तरी कामानिमित्त तर कधी वेळ भेटत नाही म्हणून जेवणाचा वेळ पुढे ढकलतो. परंतु तुम्हाला माहित आहे का असं केल्याने आपण शरीराचं नुकसान करत आहोत. भूकेकडे लक्ष न देणे हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. तसेच उपाशी राहण्याचे अनेक तोटे आहेत. जाणून घ्या त्याविषयी माहिती

*व्यायाम करणे-
आपण जर उपाशीपोटी व्यायाम करत असाल तर लगेच सावध व्हा. कारण उपाशीपोटी व्यायाम केला तर तुम्हाला व्यायाम करताना इजा होण्याची शक्यता आहे. तसेच जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातील उर्जा कमी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही, कोणताही व्यायाम करण्याआधी हलकंफुलकं काहीतरी खावं.

* उपाशीपोटी निर्णय घेणे-
जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो. उपाशी पोटी आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो. असे निर्णय चुकण्याची शक्यता असते.

* राग येणे-
तुम्हाला माहित आहे का उपाशीपोटी असल्याने लगेच राग येतो. त्यामुळे आपला वाद होण्याची शक्यता असते. परंतू हे टाळा. आपल्या मनातही नसताना आपण भावनेच्या आहारी जाऊन असं काहीतरी बोलून जातो की आपल्याला पश्चाताप केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे वेळीच हे सुधारा.

*खरेदी करणे-
उपाशीपोटी असताना कधीच खरेदी करू नका. कारण तुमचा अनावश्यक खर्च होऊ शकतो. उपाशी पोटी खरेदी करताना अनेक अनावश्यक गोष्टींची खरेदी होऊ शकते. उपाशी असल्याने गोड पदार्थ, मिठाई, कार्बोहायट्रेड युक्त खाद्य इत्यादी खरेदी करण्याच्या शक्यता जास्त आहेत.

* तिखट खाणं-
तुम्हाला जर तिखट खायची सवय असेल तर उपाशीपोटी तिखट खाऊ नका. उपाशीपोटी तिखट खाल्ल्याने पोटात जळजळल्यासारखे होईल. उपाशीपोटी तिखट खाण्याआधी साधा नाश्ता करा आणि मग तुमच्या आवडीचे मसालेदार पदार्थ खा.