पुणे : नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे रात्रीच्या सुमारास एका बेभान पिकअपने शेतमजुरांना चिरडले असून या भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. मजूर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे आपल्या घरी जात असताना ही घटना घडली आहे.

अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, हे शेतमजूर कामावरून आपल्या घरी पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे दुचाकीवरून जात होते. ते घरी जात असताना रात्रीच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे एका भरधाव पीकअपने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये मजूर चिरडले गेले. यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच येथील स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व घटनेची माहिती पोलिसांना दिली.

सुंदराबाई (वय २८ ), गौरव मधे (वय ५ ), नितीन मधे (वय २५ ) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. अशी मृतांची नावे असून, मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. अर्चना मधे आणि सुहास मधे अशी गंभीर जखमींची नावे आहेत.