लातूर : मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाताना निलंगा ते औराद महामार्गावर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना निलंगा (जि. लातूर) येथे घडली आहे. तर या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारवरील ताबा सुटल्याने सदर अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता भगवान सावळे, राजकुमार सुधाकर सावळे (सर्व रा. चाकूर) अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सावळे कुटुंब हे मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी हे कारमधून औरादकडे चालले होते. निलंगा ते औराद महामार्गावरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार पलटी झाली आणि ही कार रस्त्यालगतच्या शेतात गेली.